अहमदपूर | प्रतिनिधी (BM NEWS)
अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी पी. भुजंगराव नाईकवाडे (खुणे) यांनी राहत्या जागेचा प्रश्न निकाली काढावा आणि घराकडे जाणाऱ्या रस्त्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गेली 20 ते 25 वर्षे संबंधित जागेवर वास्तव्यास असूनही ती जागा त्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही. यासाठी त्यांनी तहसील कार्यालयासह संबंधित विभागांकडे वारंवार निवेदने दिली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, पाठपुरावा केला; मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले आणि प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असा त्यांचा आरोप आहे.
घराकडे जाणारा रस्ताही आजपर्यंत न झाल्याने विशेषतः पावसाळ्यात ये-जा करणे जीवघेणे ठरत आहे. वृद्धापकाळात स्वतःसह संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
16 जुलै 2026 रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गुंजोटी येथे सुरू झालेल्या या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणामुळे लिंबाजी नाईकवाडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषणस्थळी जाऊन त्यांची विचारपूस केली नसल्याचा आरोप होत आहे.
“जागा माझ्या नावावर करून द्या आणि घराकडे जाणाऱ्या रस्त्याची व्यवस्था करा; अन्यथा माझा जीव गेला तरी उपोषण मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका लिंबाजी नाईकवाडे यांनी घेतली आहे.
उपोषणस्थळी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा देत आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.
BM NEWS संपादकीय प्रश्न
एका 80 वर्षीय वृद्धाला न्याय मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषण करावे लागते, ही शासन-प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब नाही का? प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्या निष्पाप जीवाची आहुतीच लागणार आहे का? जर या उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याची नैतिक जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार?
आज संपूर्ण अहमदपूर तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले असून, न्याय मिळतो की केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होते, हे येणारा काळच ठरवणार आहे.


